Monday, 12 December 2016

शास्त्रीय पध्दतीने करा गहु लागवडीचे नियोजन आणि पिक व्यवस्थापन



      गहु हे रब्बी हंगामध्ये घेतले जाणारे महत्वाचे पीक आहे. उत्पादन व उत्पादकते मध्ये हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान व बिहार हे प्रमुख राज्ये आहेत. महाराष्ट्रा मध्ये देखील रब्बी हंगामामध्ये गहु उत्पादन घेतले जाते, परंतु वरती नोंदविलेल्या राज्यांच्या तुलनेत आपल्या राज्यातील शेतकर्‍यांची प्रती हेक्टरी उत्पादकता कमी आहे असे आढळून येते. जागतिक अन्नधान्य उत्पादणामध्ये भात पिकाबरोबरच गहू या पिकाचा महत्वाचा वाटा आहे. सध्या देशात संपूर्ण लोकसंख्येला पुरेल येवढे गहू उत्पादन होत आहे. परंतु प्रती हेक्टरी उत्पादकता कमी होत चालली आहे, त्यामुळे येणार्‍या काळात आपला देश गहू उत्पादनात शाश्वतरित्या सक्षम राहू शकत नाही, त्यामुळे गहू उत्पादन वाढवयाचे असेल तर गव्हाची प्रती हेक्टरी उत्पादकता वाढवणे हा एक सक्षम पर्याय ठरेल. त्या दृष्टीने जाणून घेऊया शास्त्रीय गहू उत्पादन तंत्रज्ञान.
      शेतकरी बंधुनी उपलब्ध स्रोतांचे योग्य नियोजन व वापर करून अधिक उत्पन्न घेऊ शकतात. गहू पिकाची प्रती हेक्टरी उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीने काही आधुनिक व वैज्ञानिक मुद्दे खाली दिलेले आहेत.
१. अधिक उत्पन्न देणाऱ्या वाणांची निवड :- गव्हाचे अपेक्षित उत्पन्न मिळविण्यासाठी अधिक उत्पन्न देणाऱ्या शिफारस केलेल्या वाणांची निवड अत्यंत महत्वाची ठरते. आप-आपल्या भागातील हवामानानुसार कृषि विद्यापीठांद्वारे गव्हाच्या अनेक जाती विकसित केल्या गेल्या आहेत की ज्या कीड व रोगांना प्रतिकारक्षम आहेत. रासायनिक खातांना चांगला प्रतिसाद देतात. उत्पादकता वाढीसाठी आपल्या भागासाठी शिफारशीत वाणांची निवड करावी.
२. पेरणीची पद्धत :- गहू पिकाची लागवड / पेरणी टोकन व यंत्राच्या साह्याने केली जाते. जेव्हा गहू अंतरपिक म्हणून घ्यावयाचा असल्यास पेरणीसाठी टोकण पद्धतीचा अवलंब करावा. या पद्धतीने पेरणी केल्यास दोन झाडातील व ओळीतील अंतर योग्य ठेवले जाते व पेरणीसाठी बियाणे देखील कमी लागते. तसेच झाडांची चांगली वाढ होऊन अधिक उत्पन्न मिळते. ऊसाच्या पिकामध्ये गहू अंतरपिक म्हणून यशस्वीरित्या घेता येते.
अ. आडवी उभी पेरणी (क्रॉस सोइंग) :- संशोधनानुसार आढळून आले आहे गहू पिकाची आडवी उभी पेरणी केल्यास उत्पादनात १ ते १.२५ % वाढ येते. या पद्धती मध्ये निर्धारित पेरणीसाठी वापरण्यात येणार्‍या बियाण्यामधील अर्धे (निम्मे) बियाणे एका दिशेने पेरले जाते व राहिलेले अर्धे बियाणे दुसर्‍या दिशेने पेरले जाते. या पद्धतीने पेरणी केल्यास रोपांची घनता कमी होऊन त्यांच्यातील स्पर्धा कमी होते आणि उत्पादनात वाढ दिसून येते. ज्या शेतामध्ये तणांचा प्रादुर्भाव कमी आहे, अश्या शेतामध्ये या पद्धतीचा अवलंब करावा.
ब. रोटाव्हेटरच्या सहाय्याने पेरणी करणे :- ज्या भागामध्ये पाण्याची उपलब्धता कमी आहे किंवा अगोदरच्या पिकामुळे शेत तयार करण्यास पुरेसा वेळ नाहीये अशा ठिकाणी रोटाव्हेटर च्या सहयाने अगोदरच्या पिकाचे धसकटे बारीक केले जातात आणि त्यानंतर लगेचच बी टाकून / फोकून गव्हाची पेरणी केली जाते. त्यामुळे जमीन तयार करण्याच्या खर्चात बचत होते. अगोदरच्या पिकांच्या अवशेषा मुळे जमिनीचा पोत सुधारतो व त्याचा गहू पिकाच्या वाढीसाठी मदत होते. तसेच जमिनीत असणार्‍या ओलाव्याचा पिकाच्या वाढीसाठी मदत होते.
३. गहू पिकासाठी खत व्यवस्थापन :- बागायती गव्हासाठी २०-२५ बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत नांगरणीच्या अगोदर जमिनीवर पसरून द्यावे. बागायती वेळेवर पेरणीसाठी १२० किलो नत्र: ६० किलो स्फुरद: ४० किलो पालाश पेरणीच्या वेळी द्यावे. माती परीक्षण करून वरील शिफारशीत खतमात्रेचे प्रमाण कमी अधिक करावे (१२० किलो नत्रा पैकी ६० किलो नत्र राखून ठेऊन ते पेरणीनंतर २१ दिवसांनी द्यावे.).  पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असतांना २ % यूरिया ची फवारणी द्यावी (२ किलो यूरिया १०० लिटर पाण्यात मिसळून २ % यूरिया चे द्रावण तयार होते.)  
४. पाणी व्यवस्थापन :- पाण्याची सोय असल्यास गहू पिकाची पेरणी करताना शेत अगोदर ओलवून घ्यावे व वाफसा स्थिती आल्यावर पेरणी करावी, त्यामुळे बियाण्याची उगवण चांगली होते. पाण्याच्या उपलब्धतेनुसार साधारणपणे दर १८ ते २१ दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळया द्द्याव्यात. पाण्याच्या पाळया पिकाचा कालावधी, हवामान, जमीनीनुसार इत्यादि घटकांनुसार विभिन्न असु शकतात.
पाण्याची उपलब्धता कमी असल्यास पिक वाढीच्या महत्वाच्या अवस्थेत खालील प्रमाणे पाण्याच्या पाळया द्द्याव्यात.
अ. नं
वाढीची अवस्था
दिवसांनी पाणी द्यावे
मुकूटमुळे फुटण्याची अवस्था
पेरणीनंतर १८ ते २१ दिवसांनी
कांडी धरण्याची अवस्था
पेरणीनंतर ४० ते ४५ दिवसांनी
फुलोरा आणि चिक भरण्याची अवस्था
पेरणीनंतर ६० ते ६५ दिवसांनी
दाणे भरण्याची अवस्था
पेरणीनंतर ८० ते ८५ दिवसांनी
उपलब्ध पाण्याच्या पाळया नुसार पाणी:
   १)    एकच पाणी देणे शक्य असल्यास ४०-४५ दिवसांनी पाणी द्यावे.
   २)  पिकास दोन पाणी शक्य असल्यास, पहिली पाण्याची पाळी २०-२२ दिवसांनी द्यावी व दुसरी ६०-६५ दिवसांनी द्यावी.
   ३)  गहू पिकास पेरणीनंतर तीन पाण्याच्या पाळ्या देणे शक्य असल्यास पहिले पाणी २०-२२ दिवसांनी, दुसरे ४०-४५ दिवसांनी, व तिसरे पाणी ६०-६५ दिवसांनी द्यावे.
   ४) पाण्याची शाश्वत उपलब्धता नसल्यास गव्हाच्या पंचवटी (एन आय डी ड्ब्लु-१५) या वाणाचा पेरणीसाठी उपयोग करावा.
* पीक वाढीच्या कालावधीत पाण्याचा ताण पडल्यास उत्पन्नात येणारी घट.
अ. नं
पीक वाढीची अवस्था
पेरणीनंतर दिवस
पाण्याचा ताण पडल्यास उत्पन्नात येणारी घट
मुकूटमुळे फुटण्याची अवस्था
१८-२०
३३ %
जास्तीत जास्त फुटव्याची अवस्था
३०-३५
११ %
कांडी धरण्याची अवस्था
४५-५०
११ %
फुलोरा अवस्था
६५-७०
२५ %
दाण्याची दूधाळ अवस्था
८०-८५
८.५ %
दाण्याची चिकची अवस्था
९५-१००
२.५ %
पेरणी :
जिरायत गव्हाची पेरणी ऑक्टोबरच्या दुसर्‍या पंधरवड्यात करावी. बागायती गव्हाची वेळेवर पेरणीसाठी नोव्हेंबरच्या पहिला पंधरवड्यात शिफारशीत करण्यात आला आहे. यामध्ये हवामानानुसार थोडाफार बदल होऊ शकतो. १५ नोव्हेंबर नंतर जस-जसा पेरणीस उशीर होईल तसतसे उत्पादनामध्ये घट होते. आर्थिक द्रुष्ट्या दृष्ट्या १५ नोव्हेंबर नंतर पेरणी केलेले गव्हाचे पीक फायदेशीर ठरत नाही. 
पेरणीचे अंतर:
पेरणीसाठी दोन ओळीतील अंतर १८ ते २२ सें.मी. ठेवावे व दोन रोपांमधील अंतर ५ सें.मी. ठेवावे. तसेच पेरणी करतांना बियाणे ५ ते ६ सें.मी. खोलीपर्यंत पेरावे. बियाणे जास्त खोल पडल्यास उगवणक्षमता कमी होते.          
बियाणे:
गव्हाच्या अपेक्षित उत्पादनासाठी हेक्टरी २० ते २२ लाख रोपांची संख्या असणे गरजेचे आहे. बागायती गव्हाची वेळेवर पेरणीसाठी १०० ते १२५ किलो बियाणे प्रती हेक्टरी वापरावे. बियाण्याच्या जाडीनुसार उशीरा पेरणीसाठी १२५ ते १५० किलो बियाणे प्रती हेक्टरी वापरावे, त्यामुळे उशीरा पेरणीमध्ये देखील अपेक्षित रोपांची संख्या मिळण्यास मदत होते. पेरणीच्या वेळेनुसार सुधारित व शिफारशीत वाणांची निवड करावी.     
जिवाणू खते व बीजप्रक्रिया :
बीजप्रक्रियेमुळे सशक्त व गुणवत्तायुक्त तसेच कीड व रोग मुक्त रोपे मिळतात. परंतु आज देखील असे अनेक शेतकरी आहेत की जे बीजप्रक्रिया न करताच पेरणी करतात. बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण होण्यासाठी तसेच बियांची उगवण अधिक चांगली होण्यासाठी प्रती किलो बियाण्यास २.५ ग्रॅम कार्बेन्डॅझिम किंवा खोडकिडीचा उपद्रव होऊ नये म्हणून हेक्‍टरी १ किलो फोरेट (१० जी) जमिनीत मिसळावे. पेरणीसाठी वापरण्यात येणार्‍या बियाण्यास पेरणीपूर्वी २५० ग्रॅम जिवाणू खत (Azotobactor) प्रती १० किलो बियाण्यास प्रक्रिया करून घ्यावी. प्रक्रिया केलेले बियाणे थोडा वेळ सावलीत सुकवील्यानंतर २४ तासांच्या आत पेरणीसाठी वापरावे. तसेच ७.५ किलो प्रती हेक्टरी स्फुरद विरघळवणाऱ्या जिवाणूंचे खत, जमिनीत ओलावा असतांना शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून पेरणीपूर्वी शेतात पसरावे. या खतामुळे जमिनीतील अविद्राव्य स्फुरदाचे विद्राव्य स्वरूपात रूपांतर होते व ते पिकाला उपलब्ध होऊन उत्पादनात १० ते १५ % वाढ होते.
बिजप्रक्रिया क्रम = बुरशिनाशक ----> कीटकनाशक ----> जीवणुसंवर्धक

लेखक : - प्रविण बा. बेरड आणि अमोल विजय शितोळे (पी. एच. डी. कृषि) डॉ. पंजाबराव देशमुख  
         कृषि विद्यापीठ, अकोला

No comments:

Post a Comment