सुरुवातीच्या
काळात जमिनीतील सेंद्रिय पदार्थांच्या उपलब्धतेमुळे व रासायनिक खतांच्या शेतातील
वापरामुळे उत्पादनात लक्षणीय वाढ दिसून येत होती. जमिनीतील सेंद्रिय पदार्थांमुळे
जमिनीचा पोत टिकून होता व त्यामुळेच वापरलेल्या रासायनिक खतांचा पुरेपूर फायदा
मिळत असे. परंतु पुढील काळात शेतकरी सेंद्रिय शेतीकडून रासायनिक शेतीकडे
वळल्यामुळे जमिनीच्या आरोग्याबद्दल समतोल राखला गेला नाही.
आजच्या काळात रासायनिक
खतांच्या वाढत्या किंमती आणि त्यांची दुर्मिळता यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यास ती
वापरणे परवडत नाही. म्हणून वरील गोष्टींचा विचार करता रासायनिक, सेंद्रिय व जैविक
खतांच्या वापरात समतोल राखून जमिनीचा कस कमी होऊ न देता उत्पादन वाढ करणे ही
काळाची गरज आहे. त्यासाठी रासायनिक खताला पर्याय म्हणून जैविक खताचा वापर करणे हे
फायदेशीर ठरू शकते.
निसर्गतःच जमिनीमध्ये
असंख्य सूक्ष्मजीव वास्तव्य करीत असतात. त्यामध्ये जिवाणू, बुरशी आदींचा
समावेश असतो. हे जिवाणू जमिनीमध्ये अन्नद्रव्ये व अन्न घटक वितरणाचे व
उपलब्ध करण्याचे कार्य करतात. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवायची असेल तर जमिनीतील
फायदेशीर जिवाणूंची संख्या वाढविणे गरजेचे असते. फायदेशीर जिवाणूंमध्ये
रायझोबियम, ऍझोटोबॅक्टर, ऍझोस्पिरिलम, निळे, हिरवे शेवाळे वातावरणातील
निसर्गतः उपलब्ध असलेला नत्र स्थिर करतात. त्याच प्रमाणे स्फुरद
विरघळविणारे जिवाणू उदा. बॅसिलस मेगॅथेरियम, बॅसिलस पॉलिमिक्झा, पेनिसिलियम, ऍस्परजिलस, स्युडोमोनास
स्पेसीज इत्यादी जमिनीमध्ये नैसर्गिकता उपलब्ध असलेल्या घट्ट स्वरूपातील
स्फुरदाचे विघटन करून द्राव्य स्वरूपातील स्फुरदात रूपांतर करतात. सध्याच्या
काळात मायकोरायझा जिवाणूला बरेच महत्त्व आले आहे. त्याच्या वापरामुळे पिकांना
जास्तीत जास्त किंवा पुरेशा प्रमाणात स्फुरदाचा, तसेच पाण्याचा, अन्य सूक्ष्म
अन्नघटकांचा पुरवठा होत असतो.
जैविक
किंवा जीवाणू खत म्हणजे डोळ्यांना न दिसणाऱ्या सुक्ष्म व जिवंत सुक्ष्म जिवाणूंचे
मिश्रण होय. ते बियाण्यांना लावल्याने, मातीत वापरल्याने किंवा सेंद्रिय पदार्थात
टाकल्यामुळे ठराविक ठिकाणी नत्र स्थिर करणाऱ्या, स्फुरद विरघळविणाऱ्या व सेंद्रिय
पदार्थांचे विघटन करणाऱ्या कार्यक्षम जीवाणूंच्या संख्येत खूप वाढ होते. आणि
त्यामुळे उत्पादनात वाढ होऊन जमिनीचा पोत सुधारतो व काही प्रमाणात बुरशीरोधक द्रव्यांचा
स्त्राव होत असल्याने रोगाचे पण नियंत्रण केले जाते. जैविक खतांच्या उपयुक्त
क्रियेने जमिनीत असलेले जीवाणू पिकांना अन्नद्रवे पुरवण्याचे कार्य करतात, तर
त्यातील काही जीवाणू निसर्गतः वातावरणातील मुक्त नत्र स्थिर करतात.
सध्या उपलब्ध असलेली पीकनिहाय जैविक संवर्धके पुढील प्रमाणे आहेत...
१) रायझोबीयम या जैविक
संवर्धकाचा वापर सोयाबीन, तूर, मुग, उडीद, भुईमुग, हरभरा आणि इतर डाळवर्गीय
म्हणजेच द्वीदलवर्गीय व गळीतधान्य पिकान मध्ये २५ ग्रॅम प्रति किलो बियाणे या
प्रमाणात करता येतो.
२) अॅझोटोबॅकटर या जैविक
संवर्धकाचा वापर कपाशी, ज्वारी, गहू, भात इतर तृणधान्य, सुर्यफुल, तीळ, कराळ इतर
गळीतधान्य पिकान मध्ये २५ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात करता येतो.
३) स्फुरद विरघळविणारे जीवाणू यांना इंग्रजी
मध्ये फोस्परस सोलुबीलायझिंग बँक्टेरिया म्हणजेच पी.एस.बी असे संबोधले जाते. या
जैविक संवर्धकाचा वापर सर्व पिकांकरता होतो. याचा वापर २० ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात करता
येतो.
४) ट्रायकोडर्मा हि एक जैविक
बुरशीनाशक बुरशी आहे. या जैविक संवर्धकाचा वापर सर्व पिकांकरता होतो. याचा
वापर ४ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात
करता येतो.
आता आपण जैविक खतान
संदर्भात जाणून घेऊयात –
ही खते म्हणजे, माध्यमाच्या आधारे तयार केलेले सूक्ष्म जिवाणूच असतात. ही जैविक खते पावडर
किंवा भुकटीमध्ये किंवा द्रवरूपात देखील तयार केलेली असतात. ही खते
तयार करण्याच्या वेळी एक ग्रॅम जैविक खतामध्ये कमीत कमी ५ x १०७ जिवाणू त्यात असणे आवश्यक आहे. तसेच द्रवरूपी जैविक खत असल्यास १ x १०८ जिवाणू प्रति मि.लि. असणे आवश्यक आहे. हे जैविक खत शुद्ध स्थितीत असायला हवे.
जैविक खतांचे
मुख्य प्रकार पुढील प्रमाणे आहेत –
१) नत्रयुक्त जैविक खते, २) स्फुरद युक्त जैविक खते, ३) मायकोरायझा, ४) पालाश जैविक खते आणि ५) झिंकयुक्त जैविक खते
संपूर्ण पृथ्वीतलावर
जवळपास १५० लक्ष टन नत्र स्थिर होते. त्यापैकी ५० लक्ष टन औद्योगिक
कारखान्याद्वारे स्थिर होते. ३० लक्ष टन नत्र नैसर्गिक विजेमार्फत स्थिर केले
जाते. साधारणपणे १७० लक्ष टन नत्र मातीच्या व पाण्यातील सूक्ष्म
जिवाणूंद्वारे स्थिर केले जाते. नत्रयुक्त जैविकखते तयार करताना जास्तीत जास्त
नत्र स्थिर करणारे कार्यक्षम जिवाणू वापरले जातात. त्या खतांमध्ये
पिकाच्या प्रकाराप्रमाणे जिवाणू वापरले जातात.
उदा. डाळवर्गीय पिकांसाठी वेगवेगळे रायझोबियम जिवाणू व अन्य पिकांसाठी ऍझोटोबॅक्टर, ऍझोस्पिरिलम, ऍसिटोबॅक्टर
यांचा वापर होतो. त्यापैकी ऍझोस्पिरिलम जिवाणू ऊस आणि भाताच्या
पिकांसाठी वापरतात. ऍसिटोबॅक्टर हा केवळ उसासाठीच वापरतात.
स्फुरदयुक्त
जैविक खते - निसर्गतःच जमीन, पाणी, सेंद्रिय खते, प्राण्यांच्या व पिकांच्या
अवशेषांमध्ये स्फुरद असतो. परंतु प्रत्येक वेळी हा स्फुरद पिकांना त्यांच्या वाढीसाठी
उपलब्ध होतोच असे नाही. स्फुरदाची उपलब्धता जमिनीच्या सामूवर (पीएच) अवलंबून
असते. अशा वेळी निसर्गात काही जिवाणू असे आहेत की जे या अविद्राव्य
स्फुरदावर प्रक्रिया करतात. या जिवाणूंमध्ये बॅसिलस पोलिमिक्सा बॅसिलस
मेगॅथेरियम, सुडोमोनास स्ट्रायेटा आदींचा समावेश होतो. हे जिवाणू मातीत विशिष्ट प्रकारच्या
आम्लांची निर्मिती करतात व स्फुरदाचे विघटन करून त्याला द्राव्य स्थितीत आणतात.
जेणे करून पिके सहजपणे हा द्राव्य स्फुरद घेऊ शकतात. स्फुरदयुक्त
जैविक खते याच कार्यक्षम जिवाणूंपासून तयार केलेले असतात.
मायकोरायझा - मायकोरायझा हि जैविक खते
स्फुरदयुक्त जैविक खतात मोडतात. पिकांच्या मुळात वास्तव्य करणाऱ्या
फायदेशीर बुरशींना मायकोरायझा म्हणतात. एक्टोमायकोरायझा व एन्डोमायकोरायझा
असे याचे दोन प्रकार आहेत. ही बुरशी मुळाच्या वरच्या थरात शिरून कार्य
करते. एकदा मुळात शिरकाव झाल्यानंतर त्याचे तंतुमय धागे मुळांच्या पेशीत
आपले जाळे पसरवितात. त्यालाच "अरबसल्स' म्हणतात. या
तंतुमय धाग्यांद्वारे मायकोरायझा जमिनीतील विखुरलेली आवश्यक अन्नघटके व
सूक्ष्म अन्नघटके, स्फुरद, पाणी शोषून मुळांच्या पेशीत आणतात. अरबसल्समधून ती पिकांना पुरवली
जातात. या प्रक्रियेनंतर मुळांच्या पेशीत लहान लहान गोलाकार ग्रंथी तयार
होतात. यात पिकांना पुरविल्यानंतर उरलेले अन्नघटके साठवून ठेवले जातात.
हीच अन्नघटके दुष्काळी परिस्थितीत पिकांना पुरविली जातात. मायकोरायझा खते
सर्वच पिकांसाठी, मृद् उपचार पद्धतीने वापरली जातात.
जीवाणू संवर्धने
वापरण्याची पद्धत :
१.
एक लिटर गरम
पाण्यात १२५ ग्रॅम गुळाचे द्रावण तयार करावे.
२.
वरील द्रावण थंड
झाल्यावर त्यातील पुरेशा द्रावणात २०० ते २५० ग्रॅम जीवाणू संवर्धन मिसळावे.
३.
१० ते १२ किलो
बियाणे स्वच्छ फरशीवर प्लास्टिक किंवा ताडपत्रीवर पातळ थरात पसरवून त्यावर तयार
केलेले संवर्धनाचे मिश्रण शिंपडावे.
४.
शिंपडलेले
मिश्रण हलक्या हाताने बियाण्यास चोळावे.
५.
बियाण्यास प्रथम
बुरशीनाशकाची प्रक्रिया करुन नंतर नत्र उपलब्ध करुन देणारे रायझोबीयम, स्फुरद
विरघळविणारे जीवाणू खत यांचे मिश्रण करुन लावावे.
६.
प्रक्रिया
केलेले बियाणे सावलीत वाळवावे व २४ तासाच्या आत पेरावे.
जीवाणू संवर्धने
वापरण्याचे फायदे :
१.
बियाण्याची उगवण
लवकर व जास्त प्रमाणात होते.
२.
पिकास नत्राचा
सतत पुरवठा होत असल्याने रोपांची जोमदार वाढ होते.
३.
पिकांची
रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
४.
जमिनीचा पोत
सुधारतो.
५.
रासायनिक नत्र
खतांची साधारणपणे २५ टक्के वाढ होते.
६.
वातावरणातील
समतोल राखला जातो.
७.
विद्राव्य स्फुरदाचे
विघटन होऊन द्राव्य रुपात रुपांतर होते व ते पिकांना उपलब्ध होते.
८.
पिकांचा उत्पादन
खर्च कमी केला जातो.
जीवाणू संवर्धने
वापरताना घ्यावयाची काळजी :
जीवाणू खते ही
जैविकापासून तयार केलेली असल्याने त्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
१.
जीवाणू
संवर्धनाचे पाकीट सावलीत ठेवावे.
२.
जीवाणू खत
लावलेले बियाणे रासायनिक खतात किंवा इतर औषधांमध्ये मिसळू नये.
३.
बुरशीनाशके
किंवा किटकनाशके लावायची असल्यास अशी प्रक्रिया अगोदर पूर्ण करुन शेवटी जीवाणू खत
लावावे.
४.
पाकिटावर जी
अंतिम तारीख दिली असेल त्यापूर्वीच जीवाणू खतांचा वापर करावा.
५.
जीवाणू खताचे
पाकीट नमूद केलेल्या पिकांकरीताच बीज प्रक्रीयेकरिता वापरावे अन्यथा समाधानकारक
परिणाम आढळून येत नाहीत.
वरील गोष्टींचा विचार करता रासायनिक, सेंद्रिय व जैविक खतांच्या
वापरात समतोल राखून जमिनीचा कस कमी होऊ न देता उत्पादन वाढ करणे ही काळाची गरज
आहे. त्यासाठी रासायनिक खताला पर्याय म्हणून जैविक खताचा वापर करणे हे फायदेशीर
ठरू शकते...
लेखक : - डॉ. अमोल विजय शितोळे (पी. एच. डी. कृषि)
No comments:
Post a Comment