कृषी क्षेत्रामध्ये उत्पादन वाढ आणि उत्पादकता
संतुलित ठेवण्याचे प्राथमिक उद्दिष्ट राहिले आहे, आणि
म्हणुनच उत्पादन तसेच उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीने उत्कृष्ट बियाण्याचा वापर
करणे अनिवार्य आहे. उत्कृष्ट बियाण्याच्या निवडीनंतर त्यावर चांगल्या प्रकारची बीजप्रक्रिया
करणे तितकेच महत्वाचे ठरते; कारण पेरणीनंतर अनेक प्रकारचे
रोग मुलत: बिजापासून उदभवतात आणि पसरत असतात. तात्पर्य
बियाण्याला बुरशी, कीटक तसेच असामान्य परिस्थिती पासून
संरक्षण करण्यास बीजप्रक्रियेचा मोलाचा फायदा होतो.
बीज प्रक्रियेमुळे पिकास होणारे
फायदे :
बीजप्रक्रियेमुळे सशक्त
आणि गुणवत्तायुक्त रोपे तसेच कीड आणि रोग मुक्त रोपे मिळतात. परंतु आजमितीला असे
अनेक शेतकरी आहेत की जे बीजप्रक्रिया न करताच पेरणी करतात आणि म्हणूनच
बीजप्रक्रिया केलेल्या बियाण्याच्या वापरास वाव आहे, तसेच
त्याचे फायद्यांचा प्रचार आणि प्रसार करणे खूप महत्वाचे आहे.
१) बुरशीनाशकांच्या बिजप्रक्रीयेमुळे
बियाण्याद्वारे पसरणार्या रोगांचे नियंत्रण होते :- लहाण
बिया (दाणे) असणारी पिके, भाजीपाला आणि कापूस इ. पिकावर बीजप्रक्रिया करणे महत्वाचे
ठरते.
२)
कीटकनाशकांच्या बिजप्रक्रीयेमुळे
बियाण्याचे किडींपासून संरक्षण होते :- बियाण्याची
साठवणूक करण्यापूर्वी त्याला योग्य त्या किटक नाशकाची प्रक्रिया करूनच त्याची
साठवणूक करावी, त्यामुळे गुणवत्ता टिकून राहते.
३) बुरशीनाशकांच्या बिजप्रक्रीयेमुळे
जमिनीतून पसरणार्या रोगांचे नियंत्रण :- जमिनीतील बुरशी, जीवाणू आणि सूत्राकृमी सुत्रकृमिंपासून बीज आणि ऊगवण
झालेल्या रोपांचे संरक्षण होण्यास मदत मिळते.
४) बुरशीनाशकांच्या बिजप्रक्रीयेमुळे
बियाण्याच्या उगवण क्षमतेत वाढ होते :- पेरणीसाठी वापरण्यात
येणार्या बियाण्याला योग्य त्या किटकनाशकाची आणि बुरशीनाशकाची प्रक्रिया केल्यास
कीड आणि बुरशीपासून संरक्षण होऊन उगवण क्षमतेत वाढ होते परिणामी पेरणीसाठी अधिक
बियाणे वापरावे लागत नाही.
बीजप्रक्रिया करण्याच्या
पद्धती :
या मध्ये पहिली पध्दती आहे
...
१) मिठाच्या द्रावणाचा उपयोग :-
पाण्याचा वापर करुन मिठाचे २ टक्क्याचे द्रावण तयार करुन घ्यावे. त्यासाठी २०
ग्रॅम मीठ १ लीटर पाण्यात पुर्णपणे विरघळून घ्यावे. पेरणीसाठी वापरण्यात येणार्या
बियाण्याच्या प्रमाणानुसार मीठ आणि पाणी यांचे प्रमाण कमी अधिक करावे. शेतकरी
मित्रांनो, या द्रवणात
पेरणीसाठी वापरण्यात येणारे बियाणे पुर्णपणे बुडऊन ढवळून घ्यावे हलके आणि रोगयूक्त
बियाणे पाण्यावरती तरंगु लागतात. ते बियाणे चाळणीने वेगळे करुन काढून टाकावेत, आणि तळाशी असलेल्या बियाण्याचा वापर पेरणीसाठी करावा.
पुढील
पध्दती आहे...
२)
बुरशीनाशकांचा उपयोग :- पेरणीच्या
बियाण्यावरती प्रक्रिया करण्यासाठी ते पावडर (भुकटी) स्वरुपात बाजारात उपलब्ध आहेत.
प्रक्रियेसाठी बियाण्यावरती पातळ थर तयार होईल अशा पद्धतीने प्रक्रिया करवी.
बुरशीनाशकांच्या
कार्यानुसार त्यांचे दोन गटात वर्गीकरण केले जाते :
अ) यात
पहिले रोगनाशक रसायन किंवा बुरशीनाशक याचा समावेश होतो : हे
रसायन बीजप्रक्रियेनंतर
रोगकारक बुरशीचा नाश करतात आणि बियाण्याचे बुरशी पासून रक्षण करतात. परंतु हे
रसायन बीज जमिनीत पेरल्यानंतर अधिक काळापर्यंत सक्रिय राहत नाही.
ब) दुसरा
प्रकार आहे रोगरक्षक रसायन किंवा बुरशीनाशक : या
प्रकारातील रसायने बियाण्याच्या पृष्टभागाला चिकटून राहतात तसेच बीज उगवणींनंतर
काही ठराविक काळापर्यंत पिकाचे रक्षण करतात.
बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करण्याची पध्दती या विषयी आपण सविस्तर माहिती घेऊ:-
या मध्ये पहिली पध्दती आहे ...
१) कोरडी बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया - या प्रक्रियेमध्ये रासायनिक बुरशीनाशक पावडरचा
उपयोग केला जातो. या प्रक्रियेमध्ये
अग्रोसेन जी.एन, सेरेसन, विटावॅक्स,
कॅापर सल्फेट, थायरम, बाविस्टिन इत्यादि ची २ ते २.५ ग्रॅम प्रति किलो. बियाणे या दराने वापर करावा.
या मध्ये पुढील पध्दती आहे...
२)
किडनाशकाचा उपयोग –
मातीमध्ये सुक्ष्मजीव तसेच नेक पिकास अपायकरक असणारे कीटक आढळून येतात. त्यांच्या नियंत्रणासाठी
क्लोरोपाईरीफॅास २० ई.सी. किंवा पीकनिहाय वेगवेगळे कीटकनाशक पाण्यामध्ये मिसळून
त्याचे द्रावण तयार करून बियाण्यावर शिंपडून घ्यावे आणि सुकवून बियाण्याचा पेरणीसाठी
वापर करावा.
जिवाणूखतांची बीजप्रक्रिया करण्याची पध्दती या विषयी माहिती घेऊयात : अनेक प्रकारच्या जिवाणू खतांचा वापर करून जमिनीतील
पोषक घटकांच्या उपलब्धतेमद्धे वाढ करण्यास मदत होते. सर्वसाधारणपणे पुढील प्रकारचे
जीवाणू खते वापरली जातात. जिवाणूखतांची बीजप्रक्रिया या मध्ये पहिला जीवाणू
आहे...
१) राइझोबियम
जीवाणू :- हे जिवाणू द्विदल
पिकांच्या मुळांवरील गाठीत राहून सहजीव पद्धतीने नत्र स्थिर करण्याचे काम करतात. जीवाणू
झाडातील अन्नरस मिळवतात आणि त्या बदल्यात झाडांना नत्राचा पुरवठा कारतात. राइझोबियम
जीवाणू साधारणपणे १०० ते २०० किलोग्रॅम प्रती हेक्टर नत्र स्थिर करू शकतात.
जिवाणूखतांची बीजप्रक्रिया या मध्ये दुसरा जीवाणू आहे...
२) अँझोटोबँक्टर जिवाणू :- हे जिवाणू एकदल पिकांच्या मुळांवर राहून अन्न
मिळवतात, तसेच २० ते ३० किलोग्राम प्रती हेक्टर नत्र स्थिर कारतात. जिवाणूखतांची
बीजप्रक्रिया या मध्ये तिसरा जीवाणू आहे...
३) पी.
एस. बी. जिवाणू :- हे जिवाणू मातीमधील न
विरघळणार्या, स्थिर तसेच उपलब्ध न होणार्या फॉस्फरस चे विघटन
करून तो पिकास उपलब्ध करतात. उपयोग मात्रा २५० ग्रॅम पाकीट प्रती १० किलो बियाण्यासाठी
प्रती जिवाणू संवर्धकसाठी.
जिवाणू खतांची
बीजप्रक्रिया करण्याची कृती :
जिवाणूखतांच्या प्रक्रियेचा फायदा होण्यासाठी योग्य पद्धतीने आणि काळजीपूर्वक बीजप्रक्रिया
करणे फायद्याचे ठरते.
२५० ग्रॅम जिवाणू खत १०% गुळाच्या द्रावणात (१० %=
१ लीटर पाण्यात १०० ग्रॅम गूळ विरघळून तयार होणारे द्रावन; गरजेनुसार प्रमाण कमी
आधिक करावे) मिसळून प्रति १० किलो बियाण्यास प्रक्रिया करून सावलीत सुकवून द्यावे, आणि २४ तासांच्या आत पेरणीसाठी वापरावे.
बिजप्रक्रिया क्रम = बुरशिनाशक ---->
कीटकनाशक ----> जीवणुसंवर्धक
अशाप्रकारे
कीड आणि रोगांच्या नियंत्रणासाठी आपल्याला बीजप्रक्रिया पध्दतीचा वापर करता येईल.
या पध्दतीचा अवलंब केल्याने रोगनियंत्रणाचा खर्च कमी होऊन रसायनांच्या अयोग्य
वापरामुळे होणारी निसर्गाची हानीही टाळता येईल. आपण आज घेतलेल्या माहितीचा अवलंब
करून, आपण आपल्या शेतीत भरगोस असे उत्पादन घेण्याचा प्रयत्न करावा.
लेखक : -
अमोल विजय शितोळे (पी. एच. डी. कृषि) डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला
No comments:
Post a Comment