Tuesday, 13 December 2016

जैविक संवर्धके व त्यांचा वापर


      सुरुवातीच्या काळात जमिनीतील सेंद्रिय पदार्थांच्या उपलब्धतेमुळे व रासायनिक खतांच्या शेतातील वापरामुळे उत्पादनात लक्षणीय वाढ दिसून येत होती. जमिनीतील सेंद्रिय पदार्थांमुळे जमिनीचा पोत टिकून होता व त्यामुळेच वापरलेल्या रासायनिक खतांचा पुरेपूर फायदा मिळत असे. परंतु पुढील काळात शेतकरी सेंद्रिय शेतीकडून रासायनिक शेतीकडे वळल्यामुळे जमिनीच्या आरोग्याबद्दल समतोल राखला गेला नाही.
      आजच्या काळात रासायनिक खतांच्या वाढत्या किंमती आणि त्यांची दुर्मिळता यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यास ती वापरणे परवडत नाही. म्हणून वरील गोष्टींचा विचार करता रासायनिक, सेंद्रिय व जैविक खतांच्या वापरात समतोल राखून जमिनीचा कस कमी होऊ न देता उत्पादन वाढ करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी रासायनिक खताला पर्याय म्हणून जैविक खताचा वापर करणे हे फायदेशीर ठरू शकते.
      जैविक किंवा जीवाणू खत म्हणजे डोळ्यांना न दिसणाऱ्या सुक्ष्म व जिवंत सुक्ष्म जिवाणूंचे मिश्रण होय. ते बियाण्यांना लावल्याने, मातीत वापरल्याने किंवा सेंद्रिय पदार्थात टाकल्यामुळे ठराविक ठिकाणी नत्र स्थिर करणाऱ्या, स्फुरद विरघळविणाऱ्या व सेंद्रिय पदार्थांचे विघटन करणाऱ्या कार्यक्षम जीवाणूंच्या संख्येत खूप वाढ होते. आणि त्यामुळे उत्पादनात वाढ होऊन जमिनीचा पोत सुधारतो व काही प्रमाणात बुरशीरोधक द्रव्यांचा स्त्राव होत असल्याने रोगाचे पण नियंत्रण केले जाते. जैविक खतांच्या उपयुक्त क्रियेने जमिनीत असलेले जीवाणू पिकांना अन्नद्रवे पुरवण्याचे कार्य करतात, तर त्यातील काही जीवाणू निसर्गतः वातावरणातील मुक्त नत्र स्थिर करतात.
      सध्या उपलब्ध असलेली पीकनिहाय जैविक संवर्धके पुढील तक्त्यात दिली आहेत.
जैविक संवर्धके
प्रमुख पिके
मात्रा प्रति कि. बियाणे
रायझोबीयम (द्वीदल)
सोयाबीन, तूर, मुग, उडीद,
भुईमुग, हरभरा इतर डाळवर्गीय व गळीतधान्य पिके 
२५ ग्रॅम
अॅझोटोबॅकटर
कपाशी, ज्वारी, गहू, भात इतर तृणधान्य, सुर्यफुल, तीळ, कराळ इतर गळीतधान्य पिके 
२५ ग्रॅम
स्फुरद विरघळविणारे जीवाणू
(पी. एस. बी )
सर्व पिकांकरता
२० ग्रॅम
ट्रायकोडरमा (जैविक बुरशीनाशक)
सर्व पिकांकरता
४ ग्रॅम
जीवाणू संवर्धने वापरण्याची पद्धत :
  १.      एक लिटर गरम पाण्यात १२५ ग्रॅम गुळाचे द्रावण तयार करावे.
  २.      वरील द्रावण थंड झाल्यावर त्यातील पुरेशा द्रावणात २०० ते २५० ग्रॅम जीवाणू संवर्धन मिसळावे.
  ३.      १० ते १२ किलो बियाणे स्वच्छ फरशीवर प्लास्टिक किंवा ताडपत्रीवर पातळ थरात पसरवून 
त्    यावर तयार केलेले संवर्धनाचे मिश्रण शिंपडावे.
  ४.      शिंपडलेले मिश्रण हलक्या हाताने बियाण्यास चोळावे.
  ५.      बियाण्यास प्रथम बुरशीनाशकाची प्रक्रिया करुन नंतर नत्र उपलब्ध करुन देणारे 
     रायझोबीयम, स्फुरद विरघळविणारे जीवाणू खत यांचे मिश्रण करुन लावावे.
  ६.      प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत वाळवावे व २४ तासाच्या आत पेरावे.
जीवाणू संवर्धने वापरण्याचे फायदे :
 १.      बियाण्याची उगवण लवकर व जास्त प्रमाणात होते.
 २.      पिकास नत्राचा सतत पुरवठा होत असल्याने रोपांची जोमदार वाढ होते.
 ३.      पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
 ४.      जमिनीचा पोत सुधारतो.
 ५.      रासायनिक नत्र खतांची साधारणपणे २५ टक्के वाढ होते.
 ६.      वातावरणातील समतोल राखला जातो.
 ७.      विद्राव्य स्फुरदाचे विघटन होऊन द्राव्य रुपात रुपांतर होते व ते पिकांना उपलब्ध होते.
 ८.      पिकांचा उत्पादन खर्च कमी केला जातो.
जीवाणू संवर्धने वापरताना घ्यावयाची काळजी :
जीवाणू खते ही जैविकापासून तयार केलेली असल्याने त्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
 १.      जीवाणू संवर्धनाचे पाकीट सावलीत ठेवावे.
 २.      जीवाणू खत लावलेले बियाणे रासायनिक खतात किंवा इतर औषधांमध्ये मिसळू नये.
 ३.      बुरशीनाशके किंवा किटकनाशके लावायची असल्यास अशी प्रक्रिया अगोदर पूर्ण करुन शेवटी 
    जीवाणू खत लावावे.
 ४.      पाकिटावर जी अंतिम तारीख दिली असेल त्यापूर्वीच जीवाणू खतांचा वापर करावा.
 ५.      जीवाणू खताचे पाकीट नमूद केलेल्या पिकांकरीताच बीज प्रक्रीयेकरिता वापरावे 
    अन्यथा समाधानकारक परिणाम आढळून येत नाहीत.

लेखक : - योगेश बेलकर आणि अमोल विजय शितोळे (पी. एच. डी. कृषि) डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला

No comments:

Post a Comment